कोल्हापुरात 'एक दिवसाआड' पाणी कपात रद्द करा; महाविकास आघाडीचे आयुक्तांना साकडे
कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेने शहरात लागू केलेला 'एक दिवसाआड' पाणीपुरवठ्याचा निर्णय अन्यायकारक असून, तो तातडीने रद्द करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राजेश लाटकर आणि काँग्रेस गटनेते इंद्रजित बोंद्रे यांनी पत्राद्वारे केली आहे. प्रशासनाच्या नियोजनाअभावी कोल्हापूरकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत सध्या शहरात एक दिवसाआड पाणी दिले जात आहे. मात्र, मे महिन्यातील वाढते तापमान आणि तीव्र उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत एक दिवस पाणी न येणे नागरिकांसाठी क्लेशदायक ठरत आहे. वितरण व्यवस्थेतील त्रुटी आणि नियोजनाच्या अभावामुळे शहरातील अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याचे पत्रात म्हटले आहे.यावर उपाय म्हणून विरोधी पक्षाने महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात महत्त्वाचा पर्याय सुचवला आहे. एक दिवसाआड पाणी देण्याऐवजी, पाणी वितरणाचा एकूण कालावधी थोडा कमी करावा, मात्र सर्व प्रभागांमध्ये दैनंदिन स्वरूपात विनाखंड आणि समान पाणी वाटप करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे प्रत्येक नागरिकाला रोज गरजेपुरते पाणी मिळेल आणि टंचाईची तीव्रता कमी होईल, असा विश्वास लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला आहे.
