शून्य वीज बिल मोहीम
पी. एम. सूर्यघर योजना संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणाने राबवणार
- मंत्री हसन मुश्रीफ
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृढ निश्चयातून साकारलेली पी. एम. सूर्यघर योजना संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावीपणाने राबवून पर्यावरण संरक्षण तसेच महागाईच्या कालखंडामध्ये ग्राहकांना शून्य वीज बिल आणून दिलासा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कागल तालुक्यातील पाणंद रस्ते, जयसिंगराव तलाव पाणीपुरवठा आणि महावितरणच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. कागल तालुक्यातील ८६ गावांत किमान एक किलोमीटरपर्यंतचे पाणंद रस्ते तातडीने तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जयसिंगराव तलावातील पाणी पातळी वाढवण्यासाठी लवकरच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मंत्रालयात बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
