रस्त्यांच्या समस्यांवर नगरसेविका मानसी लोळगे आक्रमक; आयुक्त राजेंद्र भारूड यांच्याकडून प्रश्नशैलीचे कौतुक
कोल्हापूर महानगरपालिकेच्या बैठकीत नगरसेविका मानसी लोळगे यांनी त्यांच्या प्रभागातील रस्त्यांच्या समस्यांचा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. खराब रस्ते, रखडलेली कामे आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडे थेट जाब विचारला.
मानसी लोळगे म्हणाल्या:
“प्रभागातील नागरिक वारंवार तक्रारी करत आहेत, मात्र कामांचा वेग दिसत नाही. काम होत नसेल तर त्याबाबत स्पष्ट उत्तर द्या!”
अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावल्याचे बैठकीत पाहायला मिळाले. त्यांच्या प्रश्न विचारण्याच्या ठाम आणि अभ्यासपूर्ण शैलीमुळे सभागृहातही या चर्चेची विशेष दखल घेण्यात आली.
सभागृहात उडाला हास्यकल्लोळ!
बैठकीत मानसी म्हणाल्या की, "अधिकारी येतात, पाहणी करतात आणि निघून जातात." यावर महापौर रूपाराणी निकम म्हणाल्या की, "माझ्यापाशी पण येत नाही, तू उलट खुश व्हायला पाहिजे की अधिकारी येतात!" या उत्तरावर संपूर्ण सभागृहात चांगलेच हास्य उडाले.
आयुक्तांकडून पाठीवर थाप
विशेष म्हणजे, महापालिका आयुक्त राजेंद्र भारूड यांनीही नगरसेविका मानसी लोळगे यांच्या प्रश्न विचारण्याच्या आक्रमक आणि अभ्यासपूर्ण शैलीचे जाहीर कौतुक केले.
या संपूर्ण घटनेमुळे सभागृहात काही काळ प्रचंड चर्चेचे वातावरण निर्माण झाले असून, आता नगरसेविकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रभागातील रस्त्यांच्या कामांना खरोखरच गती मिळणार का, याकडे कोल्हापूरच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.
