कोल्हापूर (प्रतिनिधी):
कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील बालिंगा (ता. करवीर) येथे आज सकाळी दूध वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात तीन दुचाकी, विजेचा डिजिटल बोर्ड आणि पाण्याच्या टाक्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली असली तरी वाहनांचा मात्र चक्काचूर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष पाटील (वय २७, रा. भामटे) हे दूध संघात दूध घालून टेम्पोने कोल्हापूरहून कळंबे तर्फ कळेकडे जात होते. सकाळी बालिंगा परिसरात आले असताना अचानक टेम्पोचा ब्रेक फेल झाला. वाहन नियंत्रणाबाहेर गेल्याचे लक्षात येताच चालक संतोष पाटील यांनी प्रसंगावधान राखले. रस्त्यावरील गर्दी टाळण्यासाठी त्यांनी टेम्पो झाडाच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला.
या प्रयत्नात भरधाव टेम्पोने रस्त्याच्या कडेला असलेला विजेचा डिजिटल बोर्ड, विक्रीसाठी ठेवलेल्या पाण्याच्या टाक्या आणि तिथे उभ्या असलेल्या तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. त्यानंतर टेम्पो एका झाडावर जाऊन धडकला. या धडकेत टेम्पोच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात भाऊ सुतार, सुलतान शेख आणि अकबर शेख यांच्या दुचाकींचेही नुकसान झाले आहे.
अपघातानंतर गगनबावडा मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान, या मार्गावर दूध पोहोचवण्याच्या घाईत अनेक टेम्पो भरधाव वेगाने धावतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. अशा अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने वेगमर्यादेची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
