कोल्हापूर: प्रतिनिधी
कोल्हापूरची प्रमुख व्यापारपेठ असलेल्या राजारामपुरी, शाहूपुरी, माळी कॉलनी आणि टाकाळा परिसरातील ड्रेनेज व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी, अशी मागणी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
राजारामपुरी परिसरात आजही १९६७ साली टाकलेली, म्हणजेच सुमारे ६० वर्षांपूर्वीची ड्रेनेज लाईन वापरात आहे. केवळ ४ इंच व्यासाची ही वाहिनी आजच्या वाढलेल्या लोकसंख्येसाठी आणि व्यावसायिक विस्तारामुळे अत्यंत अपुरी पडत आहे. या भागातून महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी १० कोटी रुपयांहून अधिक कर जमा होतो. असे असतानाही सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे उत्तुरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
वाढता भार लक्षात घेता या भागात २४ ते ३० इंच व्यासाची नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी महापालिकेने विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. सध्या महापालिकेकडून सम्राट नगर, प्रतिभानगर आणि विद्यापीठ परिसरात नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, या मोठ्या वाहिन्या जर राजारामपुरीतील जुन्या आणि अरुंद लाईनला जोडल्या गेल्या, तर भविष्यात या भागातील ड्रेनेजचा प्रश्न अधिकच गंभीर रूप धारण करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे, सनी शिंदे, राहुल कांबळे आणि अल्ताफ मकानदार उपस्थित होते.
