कोल्हापूर: अखिल स्तरीय माझी सेवा व आधार केंद्र संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ई-सेवा केंद्र चालकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. केंद्र चालकांना दैनंदिन कामकाजात येणाऱ्या तांत्रिक अडचणी, मानधनातील विसंगती आणि शासकीय नियमांमधील त्रुटींकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. ई-सेवा आणि आधार केंद्रांशी संबंधित तांत्रिक समस्यांमुळे केंद्र चालकांना कामात अडथळे येत असून, सेवा शुल्काबाबतही अनेक विसंगती असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले. प्रशासनाने या समस्यांवर तातडीने तोडगा काढून केंद्र चालकांना दिलासा द्यावा, अशी आग्रही भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली.
या मोर्चात संघटनेचे राज्य सचिव विनोद तायडे, राज्य सहसचिव रियाज तांबोळी, बुलढाणा राज्य प्रतिनिधी अमोल ठाकरे, राज्य प्रतिनिधी सतीश प्रभावळकर, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सचिनकुमार पोळ आणि उपाध्यक्ष प्रीतम सिंहासने यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये अर्जुन सावरे, विजय बळे, अमित चव्हाण, उत्तम पोवार, अमर वर्धन, प्रमोद इंगवले, विकास पाटील, अमित मानकापुरे, नंदू शिंदे, अमरदीप वरपे, रियाज चौगुले, अच्युत मोहिते, असिफ पठाण, सतीश तांदळे, सिकंदर मकानदार, राहुल इंग्रोळे, सागर ऐनापुरे, नंदकुमार शिंदे, शिवाजी उगले, संतोष कमते, किशोर लंगोट, रवींद्र देसाई, अक्षय बळे, सचिन मालगावे, नरेंद्र कुंभार, अमित गिरी, सम्राट बच्चे पाटील, राहुल शिंदे आदींचा समावेश होता.
शासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन केंद्र चालकांना न्याय द्यावा, अन्यथा आगामी काळात संपूर्ण राज्यात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले असून संबंधित विभागांना यावर आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे आश्वासन दिले असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.

