Team Newsskatta कोल्हापूर : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ-२०२५) मध्ये शिवाजी विद्यापीठाने यंदा उल्लेखनीय झेप घेतली आहे. देशातील आघाडीच्या २०० विद्यापीठांमध्ये आपली उपस्थिती सातत्याने कायम ठेवणाऱ्या या विद्यापीठाने राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या विशेष यादीत थेट पहिल्या ५० विद्यापीठांत स्थान मिळवले आहे.
२०१६ पासून एनआयआरएफच्या यादीत नियमित स्थान मिळवणाऱ्या शिवाजी विद्यापीठाने शैक्षणिक संस्थांची वाढती संख्या, बदलते निकष आणि स्पर्धा यांचा सामना करत आपली कामगिरी टिकवून ठेवली आहे. यंदा विद्यापीठ राष्ट्रीय स्तरावर १५१-२०० या रँकबँडमध्ये आहे, तर राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या क्रमवारीत ५१.८० गुणांसह ४५ व्या स्थानी पोहोचले आहे.
ही झेप केवळ क्रमांकात झालेली सुधारणा नाही, तर गेल्या काही वर्षांत विद्यापीठातील शिक्षक, संशोधक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांचे फलित आहे. एनआयआरएफच्या गुणवत्ताधारित निकषांनुसार शिक्षण, संशोधन आणि समाजाभिमुख कार्याची उंचावलेली पातळी हीच या यशाची खरी गुरुकिल्ली ठरली आहे.
यापूर्वी ५१-१०० या गटात असलेले शिवाजी विद्यापीठ यंदा टॉप-५० मध्ये झेप घेतल्याने कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील आणखी तीन विद्यापीठांनी यादीत ठसा उमटवला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ११ व्या, मुंबई विद्यापीठ १२ व्या तर सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ ४३ व्या क्रमांकावर पोहोचले आहे.
“शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधनातील सातत्य हेच विद्यापीठाच्या प्रगतीचे मूळ कारण आहे. भविष्यात शिवाजी विद्यापीठाचे स्थान आणखी उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहू,” असे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सांगितले.
राष्ट्रीय पातळीवर मिळालेला हा सन्मान केवळ विद्यापीठापुरता मर्यादित नसून, संपूर्ण प्रदेशासाठी अभिमानास्पद ठरतो. ज्ञान, गुणवत्ता आणि संशोधनाच्या माध्यमातून पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारे हे यश शैक्षणिक विश्वात कोल्हापूरचा ठसा अधिक गडद करणारे आहे.
