कोल्हापूर : गोकुळ दूध संघातील दूध उत्पादक संस्थांना ३ कोटी ७४ लाख रुपयांचे जाजम आणि घड्याळ भेटवस्तू देण्यात आल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तर्फे थरकाप उडवणारे आरोप झाले आहेत. निविदा न काढता कोटेशन पद्धतीने कोट्यवधींची खरेदी करून शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर डल्ला मारण्यात आल्याचा आरोप करत संघातील कारभार पूर्णपणे भ्रष्टाचाराच्या गर्तेत गेल्याचा दावा करण्यात आला आहे.
उद्धव गटाच्या नेत्यांनी थेट इशारा देत म्हटलं आहे की, "भेटवस्तू देण्याला आमचा विरोध नाही, पण खरेदीची पद्धतच संशयास्पद आहे. गोकुळ शेतकऱ्यांचा असूनही तो राजकीय अड्डा बनला आहे. कधी मेडिटेशनच्या नावाखाली फाईव्ह स्टार हॉटेलमधील सहल, कधी पशुखाद्य घोटाळा, कधी वासाचे दूध आता तर जाजम-घड्याळ प्रकरण. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशाचा सरळसरळ अपहार आहे."
नेत्यांनी गोसावी यांच्या चौकशीवर भर देत ठाम मागणी केली की, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि कोट्यवधींची रक्कम वसूल करण्यात यावी.
“गोकुळच्या हंडीतलं लोणी खाणाऱ्यांना आता शिक्षा मिळालीच पाहिजे. चुकीचा निर्णय झाला, तर चौकशी करणारांनाही शेतकरी जाब विचारतील..
