त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : त्र्यंबकेश्वर परिसरात तीन पत्रकारांवर झालेल्या अमानुष हल्ल्यामुळे संपूर्ण पत्रकार समाज आणि स्थानिक नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. झी २४ तासचे ब्युरोप्रमुख योगेश खरे, साम टीव्हीचे पत्रकार अभिजीत सोनवणे आणि पुढारी न्यूजचे किरण ताजणे यांना स्थानिक गावगुंडांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात किरण ताजणे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर इतर दोन पत्रकार जखमी असून सध्या प्राथमिक उपचार घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार वार्तांकनासाठी आले असताना काही स्थानिकांनी त्यांना अडवून मारहाण केली. पत्रकारांनी घटनास्थळावर वास्तव परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला असता, गावगुंडांनी हात उचलला. ही घटना फक्त व्यक्तिगत हल्ला नसून लोकशाहीतील चौथा स्तंभ असुरक्षित असल्याचे गंभीर संकेत देते.
या घटनेवर पत्रकार संघटनांनी कठोर शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. “जनतेचा आवाज बुलंद करणाऱ्या पत्रकारांवर हात उचलणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणे” असे पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी म्हणाले. त्यांनी पोलीस प्रशासन आणि सरकारकडून तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.
पोलीस प्रशासनाने या घटनेचा गांभीर्याने विचार करून आरोपी गावगुंडांविरोधात गुन्हा दाखल केला असून, योग्य तपास सुरू असल्याची माहिती मिळते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “या प्रकारच्या घटनांमध्ये त्वरित कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे आणि दोषींना कायद्याने शिक्षा होईल.”