पुणे : “राजकारण्यांशी पत्रकारांची मैत्री असावी की केवळ सुसंवाद? वृत्तपत्रे विशिष्ट विचारसरणीशी जोडलेली असतात का? अग्रलेखांत अवघड शब्दांचा भरणा का असतो? बातमी लिहिताना भाषेवर प्रभुत्व किती महत्त्वाचे आहे? पेड न्यूज असतात का? जाहिरात व पेड न्यूज यात नेमका फरक काय?”
असे असंख्य प्रश्न फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मराठी विभागातील विद्यार्थ्यांकडून पत्रकारांसमोर मांडले गेले.
पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना शिकवणे हा एक वेगळाच आनंद असतो; पण मराठी भाषा शिकणारे आणि मराठीवर मनापासून प्रेम करणारे विद्यार्थी जेव्हा पत्रकारितेबद्दल उत्सुकता व्यक्त करतात, तेव्हा संवाद अधिकच रोचक ठरतो. पत्रकारितेच्या क्षेत्राविषयी समाजात असलेले कुतूहल या मुला-मुलींच्या प्रश्नांतूनही प्रकर्षाने जाणवत होते.
संपूर्ण तासभर चाललेल्या या चर्चेत विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरे देताना भाषेचा दर्जा, भाषेची अचूकता आणि पत्रकारितेतील जबाबदारी यावर भर देण्यात आला. विशेष म्हणजे, प्रसारमाध्यमांतला घसरत चाललेला भाषेचा स्तर नव्या पिढीच्या विद्यार्थ्यांनाही जाणवू लागल्याचे निरीक्षण मांडण्यात आले.
या चर्चेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ. संजय तांबट, समन्वयक डॉ. वृषाली बर्गे, तसेच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. रूपाली शिंदे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नोत्तर सत्रात जगदीश बामणे, निखिल सुक्रे, वैष्णवी सुळके यांनीही सक्रिय सहभाग घेतला.
नव्या पिढीशी संवाद साधणं ही नेहमीच उभारी देणारी गोष्ट असल्याचं मत व्यक्त करून हा संवाद संस्मरणीय ठरला.
✍️ उत्तमकुमार
