दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा विजय थलपथी याने अभिनयाला पूर्णविराम देत 2024 मध्ये थेट राजकारणात उडी घेतली. त्याने स्थापन केलेल्या तमिळगा वित्र कझगम् (टीव्हीके) या पक्षाची घोषणा होताच तामिळनाडूत प्रचंड चर्चा रंगली होती. सत्ताधारी द्रमुकविरोधी पक्ष म्हणून टीव्हीकेला मोठा पर्याय मानले जात असल्याने राज्यातील जनतेत विजयच्या सभांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळू लागला. प्रत्येक सभेला गर्दी उसळत असून त्याचा जनाधार किती मोठा आहे, हे यातून स्पष्ट होत आहे.
शनिवारी तामिळनाडूतील करुर येथे विजयच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. विजयला पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक जमले होते. मात्र अचानक परिस्थिती हाताबाहेर गेली. सभास्थळी प्रचंड गोंधळ उडाला आणि मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 39 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 9 निरागस चिमुकल्यांचाही समावेश आहे. अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातानंतर संपूर्ण तामिळनाडूतच नव्हे तर देशभरातून संताप आणि दु:ख व्यक्त होत आहे. अभिनेता ते नेता झालेल्या विजयवर आणि त्यांच्या पक्षावर निषेधाची झोड उठली आहे. मोठ्या सभांमध्ये गर्दी नियंत्रणात ठेवण्यात पक्ष अपयशी ठरल्याची टीका सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात होत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मृतांना श्रद्धांजली वाहिली असून जखमींच्या उपचारांसाठी मदतीची हमी दिली आहे. राष्ट्रपतींनीही या घटनेवर खोल शोक व्यक्त केला आहे. स्थानिक प्रशासनाकडून या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून सुरक्षेतील त्रुटींवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
ही घटना विजयच्या राजकीय प्रवासाला मोठा धक्का ठरू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. कारण राजकारणात पाऊल ठेवताच एवढ्या मोठ्या दुर्घटनेची छाया त्यांच्या प्रतिमेवर उमटली आहे. विजय आणि टीव्हीकेसाठी पुढची पावले आता अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.
