मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे संकेत मिळाले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीसाठी एकत्र येत शिवसेना (ठाकरे गट) व मनसे युतीची औपचारिक घोषणा केली आहे. येत्या 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या बेस्ट निवडणुकीत दोन्ही पक्ष प्रणित उत्कर्ष पॅनलसोबत एकत्र लढणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या भेटींनी राजकीय चर्चांना उधाण आले होते. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे यांनी मातोश्रीवर भेट दिली, त्यानंतर मराठी भाषा व हिंदी सक्तीविरोधी आंदोलनातही दोघे एकत्र दिसले. या पार्श्वभूमीवर आता बेस्ट निवडणुकीत झालेली युती, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एक नवा अध्याय ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संजय राऊत यांनीही युतीसाठी जनतेचा दबाव असल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका भाजपच्या हातात जाऊ न देण्याचा मनोदय दोन्ही पक्षांनी दाखवला आहे. २० वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेची युती भविष्यात अधिक मजबूत होण्याची चिन्हे आहेत.
.jpeg)