कोल्हापूर, दि. ६ ऑगस्ट: शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टारक मठातील महादेवी हत्तीणी (माधुरी) हिच्या वनताराकडे झालेल्या हलवणीविरोधात उठलेल्या कोल्हापुरकरांच्या आवाजाने अखेर व्यवस्थापनाला झुकवले आहे. नांदणी ग्रामस्थांसह कोल्हापूरकरांनी दाखवलेल्या प्रखर निषेधाच्या पार्श्वभूमीवर वनतारा व्यवस्थापनाने महादेवी हत्तीणीला पुन्हा नांदणी मठात परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
२८ जुलै रोजी माधुरीला गुजरातमधील अंबानींच्या वनताराकडे हलवण्यात आले होते. यानंतर कोल्हापुरात संतापाची लाट उसळली. जिओ सीमकार्डवर बहिष्कार, सोशल मीडियावरून आंदोलन, तसेच ३ ऑगस्ट रोजी भव्य पदयात्रेच्या माध्यमातून कोल्हापुरकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या जनआंदोलनाच्या दडपणामुळे राज्य सरकारनेही तातडीने लक्ष घालून वनतारा व्यवस्थापनासोबत आज बैठक आयोजित केली. संध्याकाळी नांदणी मठाधिपती व वनतारा व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी वनताराचे सीईओ विहान करणी यांनी माधुरीच्या परतीसंबंधी सकारात्मक भूमिका घेतली.
विहान करणी म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे माधुरीला वनतारामध्ये हलवण्यात आले होते. मात्र, कोल्हापूरकरांच्या भावना आम्ही समजून घेतल्या आहेत. नांदणी मठात पुन्हा माधुरीसाठी आवश्यक त्या सुविधा उभारण्यात आमचा सहभाग राहील. वनतारा, सरकार व नांदणी मठाच्या वतीने न्यायालयात संयुक्त याचिका दाखल करून प्रक्रिया पूर्ण केली जाईल.”
त्यांनी हेही स्पष्ट केले की, हा कुणाचा विजय-पराजय नसून, माधुरी हत्तीणीच्या पुनर्वसनाचा आणि जनभावनांचा विजय आहे. कोल्हापुरकरांच्या भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नव्हता, असे त्यांनी नमूद केले.
वनतारामध्ये माधुरीसाठी उत्तम सुविधा उपलब्ध आहेत, परंतु नांदणी मठातही तशाच सुविधा निर्माण करण्यासाठी वनतारा व्यवस्थापन मदत करणार आहे. हत्तीणीच्या पुनर्वसनासाठी आवश्यक त्या सर्व अटींची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन करणी यांनी दिले.
महत्त्वाचे मुद्दे:
२८ जुलै रोजी माधुरी हत्तीणी वनताराकडे हलवली
कोल्हापूर व नांदणी ग्रामस्थांचा तीव्र विरोध
३ ऑगस्टला कोल्हापुरात भव्य पदयात्रा
राज्य सरकारची हस्तक्षेपाची भूमिका
वनतारा व्यवस्थापनाने नांदणी मठात परतीचा निर्णय घेतला
सर्वोच्च न्यायालयात संयुक्त याचिका दाखल होणार
नांदणी मठात माधुरीसाठी सुविधा उभारणीला वनताराची मदत
