कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अधिविभागांतील प्रवेश प्रक्रियेत अद्याप 406 जागा रिक्त आहेत. विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे विद्यापीठ प्रशासनाने 18 ऑगस्ट रोजी तिसऱ्या फेरीच्या प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 11 ऑगस्टपर्यंत राहणार आहे.
दुसऱ्या फेरीअखेर 1104 जागांपैकी 837 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून, 267 जागा भरल्या आहेत. मात्र, अद्यापही विविध अभ्यासक्रमांत 400 हून अधिक जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने तिसऱ्या फेरीद्वारे रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवेश परीक्षेची आवश्यकता नसलेल्या अभ्यासक्रमांसाठी 20 ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
या अभ्यासक्रमांसाठी पुन्हा प्रवेश प्रक्रिया उघडणार
विद्यापीठाच्या अधिविभागातील एम.एस्सी. केमिस्ट्री, फिजिक्स, बॉटनी, झूलॉजी, स्टॅटिस्टिक्स, मॅथेमॅटिक्स/ मॅथेमॅटिक्स-कंप्युटर अॅप्लिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, बायोकैमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, एन्व्हायर्नमेंटल सायन्स, योगशास्त्र, एम.एस्सी. इकॉनॉमिक्स, नॅनोसायन्स, एमबीए रूरल मॅनेजमेंट, एम.एस्सी. फूड सायन्स अॅंड टेक्नॉलॉजी, एम. ए. ट्रॅव्हल अॅंड टुरिझम, एम.जे., बी.जे., रशियन अशा विविध अभ्यासक्रमांसाठी पुन्हा प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.
शिवाजी विद्यापीठाने सीमा भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत विशेष सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. सीमावर्ती भागातील इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यापीठ संकेतस्थळावरून अधिक माहिती घेत ही संधी उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.
