BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

कोल्हापुरची जिलेबी परंपरा...

विशेष लेख कोमल वखरे 

कोल्हापूर - कोल्हापूर म्हटलं की तांबडा-पांढरा रस्सा, भरीव कळकळीची भाकरी, कुस्तीची तालीम, गडकोट आणि श्रीमंत सांस्कृतिक वारसा अशी अनेक वैशिष्ट्यं डोळ्यासमोर येतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आलं आहे ती म्हणजे जिलेबी!


मल्ल आणि जिलेबीचा गोड संबंध

कोल्हापुरात कुस्तीची परंपरा फार जुनी आहे. गल्लोगल्ली तालमी, आखाडे आणि व्यायामशाळा आजही दिसतात. तालमीत घाम गाळल्यानंतर मल्लांचा नाश्ता पौष्टिक असावा म्हणून त्यांना जिलेबी खायला मिळायची. गेल्या १०–१२ वर्षांत ही सवय एवढी रुजली की “कुस्तीपटू = जिलेबी” असा सरळ संबंध तयार झाला. व्यायामानंतर शरीराला उर्जा देण्यासाठी गोड खाणं गरजेचं असतं आणि त्यासाठी जिलेबीपेक्षा उत्तम काय असणार?


परंपरेतून वाढलेला गोडवा

सुरुवातीला केवळ मल्ल जिलबी खात होते, पण हळूहळू सामान्य लोकांमध्येही हा पायंडा रुजू लागला. तालमीभोवती लागणाऱ्या जिलेबीच्या स्टॉलवर गर्दी वाढली. लोकांना सकाळी नाश्त्यात, दुपारच्या जेवणानंतर किंवा सायंकाळी गप्पांच्या मैफिलीत जिलेबी हवीशी वाटू लागली. परिणामी कोल्हापूर जिल्ह्यात जिलेबी विक्रीचा व्यवसाय जोरात वाढू लागला.


राष्ट्रीय दिवस आणि जिलेबीची मेजवानी

 कोल्हापुरात १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) आणि २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) म्हटलं की जिलेबीचं वेगळं आकर्षण असतं. त्या दिवशी चौकाचौकात, गल्ल्यागल्लीत जिलेबी तळणाऱ्या कढईतून उठणारा सुवास वातावरण गोड करून टाकतो.

शाळा, कॉलेज, संस्था येथे ध्वजारोहण झालं की लगेच उपस्थितांना गरमागरम जिलेबी वाटली जाते.शहरातल्या तसेच ग्रामीण भागातल्या चौकांमध्ये, मंदिराबाहेर, शाळेबाहेर खास जिलेबी स्टॉल लावले जातात.या दिवसांत हजारो किलो जिलेबी विकली जाते. व्यापाऱ्यांना विशेष ऑर्डर मिळतात.खरं तर राष्ट्रीय दिवसांचा देशभक्तीचा उत्साह कोल्हापुरकर गोडवा वाढवण्यासाठी जिलेबीच्या घासात अनुभवतात.


कोल्हापुरची "जिलेबी संस्कृती"


जिलेबी ही फक्त गोडधोड राहिलेली नाही तर ती आता संस्कृती झाली आहे.

मल्लांच्या रोजच्या नाश्त्याचा अविभाज्य भाग

सण, उत्सव आणि विशेष प्रसंगी आवर्जून बनवली जाणारी गोडाईटम

राष्ट्रीय दिवसांवर परंपरेप्रमाणे वाटली जाणारी मेजवानी

स्थानिक व्यावसायिकांसाठी हमखास उत्पन्नाचं साधन

अनेक कोल्हापुरकर तर म्हणतात की, “स्वातंत्र्यदिन साजरा करायचा असेल तर ध्वजारोहण आणि जिलेबी दोन्ही अनिवार्य आहेत.”


जिलेबीमुळे रोजगार आणि व्यवसाय वाढ

जिलेबीच्या या लोकप्रियतेमुळे शहरात आणि ग्रामीण भागात असंख्य गाड्या, हॉटेल्स, आणि स्टॉल उभे राहिले.

हजारो कुटुंबांना रोजगार मिळाला.

अनेकांनी जिलेबी बनवणं ही कौशल्यपूर्ण कला म्हणून शिकून व्यवसाय सुरू केला.

१५ ऑगस्ट, २६ जानेवारी तसेच दसरा, दिवाळी, गणेशोत्सव यांसारख्या सणासुदीच्या दिवसांत जिलेबी विक्रीला सुवर्णकाळ असतो.

आज कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही गल्लीत सकाळच्या वेळी फेरफटका मारला तर गरमागरम जिलेबीचा सुवास हवेत दरवळताना नक्कीच जाणवेल. जिलेबीची ही परंपरा आता फक्त पोटभरीपुरती नाही तर कोल्हापूरच्या ओळखीचा भाग झाली आहे.

तांबडा-पांढरा रस्सा जसा कोल्हापुरचं नाव देशभर पोहोचवतो, तसंच आता जिलेबीही कोल्हापुरच्या गोड संस्कृतीचं प्रतीक बनली आहे. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाचा उत्साह जिलेबीच्या गोडव्यातून अजूनच गडद होतो  हीच खरी कोल्हापुरी शान आहे.


थोडे नवीन जरा जुने