तिसंगी (प्रतिनिधी): कळे–गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या अत्यंत दुरवस्थेविरोधात आज तिसंगी येथे नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, विद्यार्थी, शेतकरी आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सोनाली विलास पाटील यांनी थेट रस्त्यावरील खड्ड्यात बसून अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही रस्त्याची अशी दुरवस्था झाल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच रस्त्याची तातडीने दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
या आंदोलनात जिल्हा परिषदेच्या माजी सभापती छाया देसाई, जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर, पंचायत समिती सदस्य अमर कांबळे, माजी सभापती बंकट थोडगे, विलास पाटील, प्रकाश देसाई, प्रकाश पाटील यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
आंदोलकांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली नाही, तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.


