विद्यार्थी आंदोलनाच्या विजयाचा कोल्हापुरात जल्लोष; शिवसेना-युवासेनेतर्फे विजयोत्सव
कोल्हापूर : प्रतिनिधी
दिल्लीतील जंतर-मंतर येथे कथित पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ देशभरातील विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेनेच्या वतीने विजयोत्सव साजरा करण्यात आला.
ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम करत घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे हा विजय मिळाल्याची भावना उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तसेच शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय आणि स्पर्धा परीक्षांमध्ये प्रामाणिकपणा कायम राखण्यासाठी अशा लढ्यांची गरज असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख विराज पाटील यांनी, विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्याला शिवसेनेचा कायम पाठिंबा राहील, असे सांगितले. विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात आवाज उठविणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, युवकांच्या न्याय्य मागण्यांसाठी भविष्यातही पक्ष ठामपणे उभा राहील, असे त्यांनी म्हटले.
या विजयोत्सवात शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख व युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने, महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तरे, शहरप्रमुख विशाल देवकुळे, माजी नगरसेवक सुनील मोदी, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, सुरेश पवार, स्मिता सावंत, भरत आमटे, चैतन्य देशपांडे, रणजीत आयरेकर, सुमित मेळवंकी, दिपाली शिंदे, दिनेश साळुंखे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम करत उपस्थितांनी एकजुटीची शपथ घेतली आणि न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्याला पाठिंबा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
