पाणी वाचवा, सृष्टी जगवा; जल व्यवस्थापन पंधरवड्याचा कोल्हापुरात दिमाखदार समारोप
कोल्हापूर | दिनांक: ३०
"जागतिक तापमान हा विषय अतिशय चिंताजनक आहे. अद्याप अजूनही वेळ गेलेली नाही, यावर अतिशय गांभीर्यपूर्वक नियोजन करणे गरजेचे आहे. पर्यावरणातील वाढते बदल लक्षात घेता जल व्यवस्थापनाची अत्यंत आवश्यकता आहे," असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे पर्यावरण शास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी. डी. राऊत यांनी केले.
जलसंपदा विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यानिमित्त कार्यशाळा, महिला मेळावा व समारोप प्रसंगी "वातावरणातील बदल आणि कार्बन संचयन" या विषयावर ते बोलत होते.
व्यासपीठावरील मान्यवर:
रोहयो उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जलसंपदाचे अधिक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, उप अधिक्षक अभियंता संजय पाटील, कार्य अभियंता स्मिता माने, देवाप्पा शिंदे, अशोक पवार, गुण नियंत्रक उप अभियंता पुनम माने, व्याख्यात्या राणी पाटील, प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.प्रा. राऊत पुढे म्हणाले की, वृक्ष लागवडीला प्राधान्य देणे व हवामानातील बदल समजून घेणे आवश्यक आहे. तर "स्त्री कालची आजची आणि उद्याची" या विषयावर यशस्वी महिला सबलीकरण फाउंडेशन भुयेवाडीच्या संस्थापक अध्यक्ष राणी पाटील बोलताना म्हणाल्या, "स्त्रीला समाजाने सर्वत्र सन्मानाची वागणूक द्यावी. दुर्दैवाने हल्ली कुटुंब व्यवस्थेत कमतरता जाणवत आहे हे चित्र बदलायला हवे. स्त्रीमध्ये सर्वाधिक क्षमता असल्याने ती सर्व पातळीवर यशस्वी झाली आहे," असे सांगून त्यांनी तिच्यातील 'तिला' सन्मान देण्याचे आवाहन केले.
प्रारंभी या पंधरवड्याच्या अनुषंगाने जल प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी अधीक्षक श्री. म्हेत्रे यांनी कृती पंधरवाडा आयोजनाचा आढावा घेऊन, जलसंपदा विभागाकडून राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उपजिल्हाधिकारी शक्ती कदम व प्रसाद संकपाळ यांनीही आपले विचार व्यक्त केले.
यावेळी जल कृतीपंधरवड्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अभियंत्यांचा, प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

