केएसएच्या भूमिकेचा निषेध; शिवाजी तरुण मंडळाने 'लीग चषक' आणि बक्षीस रक्कम केली परत
राजेश चषक फुटबॉल स्पर्धेतील वादावरून शिवाजी तरुण मंडळ आणि कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (केएसए) यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे.
वारंवार पाठपुरावा करूनही केएसएकडून न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ, शिवाजी तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज ‘शाहू छत्रपती केएसए लीग’चा विजेता चषक आणि दीड लाख रुपयांची बक्षीस रक्कम केएसएला परत केली. या धक्कादायक निर्णयामुळे कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
राजेश चषक स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ यांच्यात अंतिम सामना झाला होता. या सामन्यात पंच मारहाण प्रकरणावरून केएसएने शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंवर तीन सामन्यांची बंदी घातली होती. या निर्णयावर आक्षेप घेत, मंडळाने पंचांच्या कार्यपद्धतीवरही चौकशीची आणि कारवाईची मागणी केली होती. मात्र, महिना उलटूनही केएसएने यावर कोणताही ठोस निर्णय घेतला नाही.
९३ वर्षांच्या परंपरेचा अवमान?
शिवाजी तरुण मंडळाने केएसएला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "मंडळाला ९३ वर्षांची मोठी परंपरा आहे. केवळ कोल्हापुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात या संघाचा नावलौकिक आहे. मैदानावर खेळाडूवृत्ती आणि नियमांचे पालन करण्याबाबत आग्रही असणाऱ्या केएसएकडून मंडळाला जी वागणूक मिळाली, ती अत्यंत क्लेशदायक आणि अन्यायकारक आहे. वारंवार लेखी पत्राद्वारे विनंती करूनही असोसिएशनने त्याची साधी दखलही घेतली नाही."
निषेध म्हणून चषक सुपूर्द
आज शिवाजी तरुण मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केएसए कार्यालयात जाऊन आपला तीव्र निषेध नोंदवला. अन्यायाची दाद मिळत नसल्याने त्यांनी सन्मानाने जिंकलेला लीग चषक आणि दीड लाखाचा धनादेश केएसएचे अमर पवार यांच्याकडे सुपूर्द केला.