कॅनव्हास निसर्गाचा, साथ कलेची!
खरतर कोकण हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पियाळी सारख्या छोट्याश्या गावातील पूजा कदम या चित्रकर्तीने निसर्गाने दिलेल्या क्रियेटिव्हिटीचा कॅनव्हास म्हणून वापर करत आजबाजूच्या परिसरातील पानं, दगड, माठ, बाटल्या यांच्यात एक वेगळं सौंदर्य पाहत आपल्या कलेला एक सुंदर कलाकृतीत उतरवले आहे.
निसर्गाने आपल्याला एवढे सर्व प्रकारच्या क्रिएटिव्ह गोष्टी दिलेल्या आहेत त्यांचाच कॅनव्हास म्हणून वापर करू शकतो. तिथूनच मग त्यांनी आजबाजूला टाकाऊ किंवा कमी महत्वाच्या वाटणाऱ्या गोष्टींमध्ये सौंदर्य पाहायला सुरुवात केली. कलेचे कोणतंही औपचारिक शिक्षण न घेता त्यांनी स्वतः ला स्वतःच शिक्षक बनवत आणि यु ट्यूब आणि सोशल मीडियावर उपलब्ध होणाऱ्या ज्ञानातून आपल्या कलेला विकसित करायचं ठरवलं. महागड्या कॅनव्हास किंवा वस्तू वापरण्यापेक्षा, त्यांनी त्यांच्याजवळील सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींमधून काहीतरी सुंदर गोष्टींची निर्मिती केली.
नंतर घरातील सूप, मडके, दगड, बॉटल्स यांच्यावर तर आजबाजूच्या परिसरातील पाने, फुले, सुकलेले मशरूम्स यांच्यावर आपली कला रेखाटायला सुरुवात केली. पूजा यांनी फक्त चित्रेच रेखाटली नसून तरुण पिढीलाही थोर समाजसुधारकांचे विचार समजावेत यासाठी सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छ. शिवाजी महाराज यांसारख्या चेह्र्यांवरील वास्तविक भाव दगडांवर रंगवत लोकांपर्यंत संदेश पोहचवण्याचे मार्ग साधला आहे.
निसर्गाशी जोडलेलं काम करताना त्यांना एक वेगळाच आनंद मिळत गेला आणि तिथूनच त्यांच्या कलेचा प्रवास घडत गेला. आतापर्यंत त्यांनी बॉटल पेंट्स, स्टोन पेंट्स, स्टरिंग पेंट्स अशा बारा प्रकारच्या पेंटिंग शैली हाताळल्या आहेत. शहरातील आलिशान स्टुडिओ नसला तरी, कोकणच्या या मातीने आणि निसर्गाने पूजा यांच्या हातांना दिलेली ही जादू खऱ्या अर्थाने 'निसर्गकन्या' ही ओळख सार्थ ठरवते.

