BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

पद हे जनतेची सेवा करण्यासाठी असते अधिकारी गाजवण्यासाठी नाही : सरन्यायाधीश भूषण गवई - कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन...

कोल्हापूर, दि.17 : कोल्हापूरकरांचा दीर्घकाळचा न्याय मिळवण्याचा लढा आज ऐतिहासिक क्षणात परिवर्तित झाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते पार पडले. यावेळी गवई म्हणाले, “समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सर्वांनी सहभागी व्हावे. सर्किट बेंचचे खंडपीठात रूपांतर लवकरच होईल, प्रस्ताव आल्यानंतर उच्च न्यायालयाने ते सादर करावे आणि शासन त्याला तत्परतेने मान्यता देईल.”


मेरी वेदर क्रीडांगणावर झालेल्या प्रमुख सभेत त्यांनी सांगितले की, गेल्या 43 वर्षांपासून चाललेल्या खंडपीठाच्या मागणीत ते स्वतः 25 वर्षे सहभागी राहिले आहेत. “न्यायव्यवस्थेचे विकेंद्रीकरण ही माझी कायमची भूमिका होती. माझ्या नियुक्तीनंतर ही संधी मिळाली आणि ती प्रत्यक्षात आली, याचा आनंद आहे,” असे ते म्हणाले.


कोल्हापूरकरांच्या प्रेमाने भारावून गेलो 

सर्किट बेंच शुभारंभाच्या निमित्ताने कोल्हापूर भेटीत मिळालेल्या प्रेमाने ते भारावले असल्याचे भूषण गवईंनी स्पष्ट केले. शाहू महाराजांच्या कार्यभूमीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या वारशाला न्याय देण्याचे हे व्यासपीठ ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “नियतीने ही संधी दिली असून आजचा क्षण माझ्या सरन्यायाधीशपदाच्या नियुक्तीइतकाच आनंददायी आहे,” असे ते म्हणाले.


बेंचचे खरे शिल्पकार – गवई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कोल्हापूर बेंच हे जवळपास 50 वर्षांच्या पाठपुराव्यानंतर उभे राहत आहे. या निर्मितीचे खरे शिल्पकार गवई आहेत. त्यांनी केवळ मंजुरीच दिली नाही, तर उद्घाटनाची तारीख ठरवून हे स्वप्न साकार केले.” त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शेंडा पार्क येथील 25 एकर जमिनीचे हस्तांतरण उच्च न्यायालयाला करण्याचे आदेश दिले तसेच कोल्हापूरला साजेशी नवी इमारत उभारण्याची हमीही दिली.


सामाजिक न्यायाचे वर्तुळ पूर्ण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

“राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची भूमिका कोल्हापूरमधून देशाला दिली. आज गवई यांच्या मार्गदर्शनाखाली सर्किट बेंच स्थापन होणे हा सामाजिक न्यायाचा परिघ पूर्ण होण्याचा क्षण आहे,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिपादन केले.


कार्यक्रमाला मान्यवरांची मोठी उपस्थिती

या ऐतिहासिक सोहळ्याला मुख्य न्यायाधीश अलोक अराधे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, न्यायमूर्ती चंद्रशेखर, न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, खासदार शाहू महाराज छत्रपती, बार कौन्सिलचे प्रतिनिधी, राज्याचे ॲडव्होकेट जनरल डॉ. बिरेंद्र सराफ, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग, ॲड. संग्राम देसाई, ॲड. अमोल सावंत, तसेच राज्यातील विविध मंत्री, खासदार, आमदार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सभेचे स्वागतपर भाषण ॲड. संग्राम देसाई यांनी केले, तर आभारप्रदर्शन कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विजयराव पाटील यांनी मानले.


थोडे नवीन जरा जुने