कोल्हापूर प्रतिनिधी : शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात शेतकरी आता स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी एक वेगळाच हल्ला चढवणार आहेत. “तिरंगा झळकतोय आमच्या शेतात – शक्तीपीठ नको आमच्या वावरात” या घोषणेसह राज्यातील बारा जिल्ह्यांमधील ज्या शेतातून हा महामार्ग जाणार आहे, त्या शेतातच १५ ऑगस्टला तिरंगा फडकावला जाणार आहे.
हा निर्णय शनिवारी आयोजित शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या ऑनलाइन बैठकीत घेण्यात आला. खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार अमित देशमुख, माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार विनायक राऊत, आमदार कैलास पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह बाराही जिल्ह्यांतील शेतकरी व लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
बैठकीत ग्रामसभांमधून शक्तीपीठविरोधी ठराव घेण्याचा आणि गावागावांत सह्यांची मोहीम राबवण्याचा निर्णयही झाला. त्याचबरोबर १५ ऑगस्टला शक्तीपीठ मार्गावर येणाऱ्या शेतांमध्ये मेळावे घेऊन लढ्याची दिशा ठरवली जाणार आहे.
आमदार सतेज पाटील यांनी “८६ हजार कोटींचा प्रकल्प आता १ लाख ६ हजार कोटींवर गेला. सरकार कितीही दबाव टाको, शेतकऱ्यांच्या जमिनीवरचा हा महामार्ग होऊ देणार नाही” असा ठाम इशारा दिला. राजू शेट्टी यांनी “पिकाऊ जमिनीचे रक्षण म्हणजेच जमिनीला स्वातंत्र्य देणे” असे सांगत स्वातंत्र्यदिनी मेळावे घेण्याचे आवाहन केले.
आमदार कैलास पाटील यांनी हा प्रकल्प “मुख्यमंत्र्यांचा ड्रीम की क्रीम?” असा सवाल उपस्थित केला. माजी खासदार विनायक राऊत यांनी “शेतकऱ्यांचा कणा मोडणारा हा प्रकल्प हाणून पाडू” असा इशारा दिला. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दहा गावांत सह्यांची मोठी मोहीम राबवण्याची घोषणा केली.
दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने १३ ऑगस्टला देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली असून, शक्तीपीठ बाधित शेतकरी मोठ्या संख्येने बिंदू चौकात जमणार आहेत.
.jpeg)